
गडचिरोली
शेवटी राज्यात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला.यानुसार येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका संपन्न होणार आहेत.23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.महाविकास आघाडीकडून काॅग्रेसच मोठा भाउ असल्याचे स्पष्ट होत आहे.अशात गडचिरोली जिल्हयातील अनेकांचे लक्ष लागून असलेल्या अहेरी विधानसभा मतदारसंघात काॅग्रेसने उमेदवारीसाठी जोरदार फिल्डींग लावली आहे.काही दिवसापूर्वी पार पडलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघात काॅग्रेसचाच उमेदवार असेल असे ठासून सांगितले होते.आता यानंतर काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी या जागेसाठी कंबर कसली आहे.गेल्या वर्षभरापासून कंकडालवार यांच्या नेतृत्वात सेवानिवृत्त वरिष्ठ वनाधिकारी हनुमंतू मडावी हे विधानसभा मतदारसंघात सक्रियपणे काम करताहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहेरी विधानसभा मतदारसंघात मागील काळात मोठे राजकीय समीकरण बघालया मिळाले.या मतदारसंघात महायुतीकडून अजीत पवार गटाचे धर्मराव आत्राम यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे.अशात भाजपचे अम्ब्रीशराव आत्राम वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहेत.दुसरीकडे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करित भाग्यश्री आत्राम यांनी विधानसभा निवडणूकीला सामोरे जाण्याचे पक्के केले आहे.काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघ हा आमचा बालेकिल्ला आहे.याठिकाणी आमचाच उमेदवार असल्याचे सांगितले होते.पण महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतरच या मुददयावर तोडगा निघेल असे त्यांनी स्पष्ट केले होते.तर दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांनी अहेरीत पितापुत्रीची नौटंकी सुरू आहे.नागरिकांना यांची चालबाजी समजली आहे.त्यामुळे यावेळी कुठल्याही स्थितीत अहेरी विधानसभा मतदारसंघात केवळ काॅग्रेसचाच उमेदवार असेल असे त्यांनी ठासून सांगितले होते.
लोकसभा निवडणुकीत अहेरी मतदारसंघात काॅग्रेसला मोठी आघाडी मिळाली होती.याचे श्रेय काॅग्रेस नेते अजय कंकडालवार यांनाच मिळाले.त्यांच्याच नेतृत्वात अहेरीसारख्या मोठया मतदारसंघात परिवर्तनाची नांदी बघायला मिळाली होती.आता विधानसभा निवडणुकीत हनुमंतू मडावी यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून तर त्यांच्या विजयाचा पाया रोवण्यासाठी कंकडालवारांनी सर्व शक्ती पणास लावली आहे.विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.महाविकास आघाडीत काॅग्रेस मोठया भावाच्या भूमीकेत असणार आहे.विदर्भातून जास्तीत जास्त जागा लढवून विजय मिळविण्यासठी काॅग्रेसचा मेगाप्लॅन तयार आहे.अशात विजयाची मोठी शक्यता असलेला अहेरी मतदारसंघ काॅग्रेसलाच मिळावा यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.



