
चंद्रपूर
बहुजन समाज एक झाला तर काय होऊ शकते याचा साक्षात्कार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी दाखवून दिला. माझा झालेला विजय हा खऱ्या अर्थाने येथील बहुजनांचाच आहे.आपली पुढील लढाई बहुजनांच्या कल्याणासाठीची असेल.देशातील हुकूमशाही वृत्तीला उखडून फेकण्याची वेळ आलेली आहे.अनं त्याची सुरवात आता झालेली आहे.अनेक इतर समाज आरक्षणासाठी आपली लढाई लढत आहेत. त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. पण हे करतांना ओबीसी कोट्यातून त्यांना आरक्षण देऊ नये. असे झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू. केंद्रात ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय व्हावे ही आमची मागणी आहे. त्यासाठी आवाज बुलंद करू.असे सांगत नवनिर्वाचित खासदार प्रतीभा धानोरकर यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली.
चंद्रपूरातील प्रियदर्शिनी सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अनुसूचित जाती, जमाती व सामाजिक संघटनाच्या वतीने खासदार प्रतीभा धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.राष्ट्रीय ओबीसी महासंघांचे अध्यक्ष बबनराव तायवडे, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, सचिन राजूरकर यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ चंद्रपूरच नाही तर महाराष्ट्रात आणि देशात ओबीसी महासंघ आणि बहुजन एकता यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे देशात प्रचंड राजकीय बदल पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे चंद्रपुरातही यावेळी ओबीसी आणि बहुजन संघटनांनी प्रतिभा धानोरकर यांच्या मागे सर्व ताकद लावली होती, त्याचा परिणाम म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात प्रतिभा धानोरकर 2,60,000 हून अधिक मतांनी विजयी झाल्या. या विजयानंतर प्रथमच राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे चंद्रपुरात त्यांच्या सत्कारासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.नवनिर्वाचित खासदाराने ओबीसी समाजासाठी काम करणे गरजेचे असून समाजाचा आवाज दिल्लीच्या संसदेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले



